



🔹जगन्नाथ बाबा नगरातील ‘त्या’ दारू दुकानांचा जनता करणार निषेध
✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.18एप्रिल): -जगन्नाथबाबा मठासारख्या पवित्र स्थळावरील चौकात राम सेतु पुलालगत नवीन देशी दारूभट्टी व बिअरशॉपी ला परवानगी देण्यात आली आहे.परवानगी देणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा तसेच राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचा तिव्र निषेध नोंदवून हे दोन्ही दुकान रद्द करण्यासाठी जगन्नाथ बाबा नगर येथील जनता उपमहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागास निवेदन सादर करणार आहेत.
राहुल पावडे म्हणाले,राज्य सरकारच्या व पालकमंत्र्याच्या चंद्रपूर दारूबंदी उठविण्यामुळेच नागरीकांना हा त्रास होतो आहे.चंद्रपुर महानगराचा अभ्यास केला तर,शहरात प्रवेश करताच चारही बाजूने सीमेवर दारू उपलब्ध आहे.जटपूरा गेट ते रामसेतु मार्ग वर देशी दारू,बियर बार व बियर शॉपीचा भरणा आहे.ही दुकाने सुरू असतांना नवीन दुकाने कशाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.नवीनतम दारूभट्टी जगन्नाथ बाबा नगर मधुन हटविण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी नगिनाबाग प्रभाग नागरीकांसमवेत जिल्हाधिकारी तथा राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना निवेदन सादर करणार.ही भट्टी रद्द होत पर्यंत लढा दिला जाईल अशी घोषणा पावडे यांनी केली.
जगन्नाथ बाबा नगरातील हा परिसर नागरिकांच्या स्वास्थ्य समृद्धीसाठी महत्वाचा आहे.शहरातील बरेच नागरिक विशेषतः महिला व जेष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळ येथे सुदृढ आरोग्यासाठी मार्गक्रमण करतात.ही दुकाने सुरू झाली तर याचा प्रचंड त्रास त्यांना सहन करावा लागणार आहे.अश्यात अनुचित प्रकार घडला तर यास जबाबदार कोण.?असा प्रश्न या वेळी उपस्थित नागरिकांनी उपस्थित केला.
या परिसरात फक्त जगन्नाथबाबांचे मठ नसून गायत्री शक्तीपीठ,बालाजी मन्दिर,कॉरमेल शाळा,किमान 5 मंगल कार्यलय(लॉन) आदी क्षेत्र आहेत.त्यामुळे ही येथे नागरिकांची वर्दळ असते.त्या मुळे कुठल्याही परिस्थितीत ही दुकाने रद्द करावीच लागेल,असे पावडे यांनी ठणकावून सांगितले.
नागरिकांना आवाहन
जगन्नाथ बाबा नगर हे अतिशय महत्वाचे धार्मिक स्थान आहे.महानगरातील हजारो भाविक विशेषतः महिला,युवती व जेष्ठ नागरिक यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे.त्यामुळे नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा नगीनाबाग प्रभाग तर्फे करण्यात आले आहे.
या परिसरात अनेक धार्मिक आयोजन असते,श्री बालाजी मन्दिर येथे श्री बालजींचा विवाह सोहळा,गायत्री शक्तीपीठला विविध कार्यक्रम,जगन्नाथ बाबा मठात राम नवमी,हनुमान जन्मोत्सव,हनुमान जयंती आदि….या सर्व उपक्रमात महानगरातील सहभागी होतात.हे जगजाहीर असतांना,देशीदारू व बियर शॉपीची परवानगी देऊन जिल्हाधिकारी व पालकमंत्री नागरिकांच्या भावनांशी खेळ करत आहे.असा आरोप उपमहापौर राहुल पावडे यांनी केला आहे.


