




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.23फेब्रुवारी):-कोरेगाव भिमा येथे शौर्याचे प्रतिक म्हणून मोठी वास्तू उभी करायची आहे. भावी पिढीला प्रेरणा मिळावी असे सुंदर स्मारक येथे उभारण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कोरेगाव भिमा येथील स्मारकाच्या विकासकामांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, शासनाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. जागेची अडचण दूर झाल्यानंतर या कामाला वेग देता येईल. त्यामुळे कायदेशीर बाबींसाठी तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात यावे. विविध देशात पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून अशी स्मारके उभारुन त्यांचे जतन करण्यात येते. त्याच धर्तीवर सुंदर आणि त्या काळातील स्मृतींना उजाळा देणारे स्मारक उभारावे. या परिसरात कायमस्वरुपी वाहनतळ, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृह आदी कायमस्वरुपी सुविधा निर्माण करण्याचा विचार व्हावा. स्मारकाच्या आराखड्यासाठी संकल्पना स्पर्धा घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांनी यावेळी सांगितले.
दुर्गम भागातील ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करावी
ऊसतोडणी मजुरांचे सहा महिने ऊस तोडणीत जातात. त्यांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपमध्ये सर्व कामगारांची नोंदणी ऑनलाईन करता येणार नाही. त्यामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. त्यांच्या कामाच्या जागेवर नोंदणी करून नंतर साखर कारखान्यांच्या मदतीने ऑनलाईन माहिती भरावी तसेच कारखाना आणि ग्रामसेवकांकडून या माहितीची खात्री करुन घ्यावी, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या.
मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. महामंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथे राहील आणि बीड परिसरात ऊसतोडणी कामगारांची अधिक संख्या लक्षात घेता उपकार्यालय बीड येथे असणे आवश्यक आहे. मुख्य कार्यालयासाठी इमारत तयार होईपर्यंत शिवाजी नगर येथील खाजगी जागेत कार्यालय सुरू करावे. महामंडळाचे कामकाज त्वरीत सुरू करून मजुरांना शासनाच्या योजनेचा लाभ देण्याचे प्रयत्न करावे. त्यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल असे मुंडे यावेळी म्हणाले.
ऊसतोडणीचे काम मजुरांकडून केल्यानंतर साखरेचा उतारा अधिक मिळतो असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे कारखाना आणि मजुरांचे संबंध साखर उत्पादन असेपर्यंत कायम राहणार आहे. या मजुरांची दिनचर्या लक्षात घेता त्यांचे श्रम कमी करण्यासाठी त्यांना सुविधा देण्यासोबतच महामंडळाने ऊसतोडणी कामगारांचे श्रम कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. साखर आयुक्त आणि महामंडळाच्या समन्वयाने साखर कारखान्यांची कार्यशाळा आयोजित करुन नोंदणी प्रकियेबाबत माहिती संबंधित कामगारांना देण्याचे सांगितल.




