✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114
बीड(दि.23फेब्रुवारी):-काही दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या विविध परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते.त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, पेपरफुटीच्या घटना घडू नयेत व पारदर्शक वातावरणात या परीक्षा पार पडाव्यात, यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.त्यानुसार या परीक्षांचा प्रश्नपत्रिका संच पाकिट विद्यार्थ्यांसमोर फोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिकेचे प्रत्येक पाकीट या वर्षापासून विद्यार्थ्यांसमोरच फोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याशिवाय आणखी काही कठोर निर्णय आज बोर्डाकडून जाहीर केले जाणार असल्याची माहिती मिळाली.हे प्रस्ताव मान्य झाल्यास, प्रत्येक पाकिटात २५ प्रश्नपत्रिका असतील व त्याचे पाकिट विद्यार्थ्यांसमोरच फोडण्यात येणार आहेत.त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याची शक्यता कमी होईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.परीक्षा केंद्रावर ‘थ्री लेअर’ पाकिटात प्रश्नपत्रिका देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. मुख्य केंद्रातून परीक्षेपूर्वी ४० मिनिटे आधी या प्रश्नपत्रिका उपकेंद्रावर पोहोचणार आहेत.प्रत्येक पाकिटात २५ प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. परीक्षा सुरु होताना केंद्र संचालक, पर्यवेक्षक विद्यार्थ्यांसमोर प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडतील. त्यामुळे पेपरफुटीला आळा बसेल, असा दावा राज्य शिक्षण मंडळाने केला आहे.