



🔹मी तात्यासाहेबांच्या विचारांचा वारसदार, पुरस्काराने ऊर्जा मिळते – पी.डी.पाटील सर
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)
धरणगाव(दि.21फेब्रुवारी):- येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील अल्पबचत भवन येथे दि. २० फेब्रुवारी, २०२२ रविवार रोजी महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन या खऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद यांच्यातर्फे ” जिल्हास्तरीय तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले गुणवंत समता शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
समता शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक म.रा.स.शि. परीषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ उपाध्यक्ष रावसाहेब जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता शिक्षक परिषदेचे संचालक अध्यक्ष डी.के.अहिरे, प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील, प्रमुख वक्ते वोपा चे डायरेक्टर प्रफुल्ल शशिकांत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, डायट चे प्राचार्य डॉ.अनिल झोपे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, सि.रा.प्रो.से.राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलींद जीवने, माध्यमिक च्या उपशिक्षणाधिकारी कल्पनाताई चव्हाण, डॉ.डी.एम.देवांग, एरंडोल चे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, रावेर चे शैलेश ढाकणे, शिक्षण विस्ताराधिकारी रविकिरण बिऱ्हाडे, खलील शेख, राज्य समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ, प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब जगताप, प्रदेश सचिव श्यामकुमार जाधव, राज्य सदस्य राजेंद्र पारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची देवता सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मा. प्रफुल्ल शशिकांत यांनी ऑनलाइन शिक्षण काळाची गरज या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. विचारपीठावरील अनेक मान्यवरांनी मनोगतातून ज्ञानदानाचे महत्त्व पटवुन दिले. शिक्षक हा समाज घडविण्याचा शिल्पकार आहे असे प्रतिपादन नामदार गुलाबरावजी पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रा.भरत शिरसाठ, अजय भामरे लिखित स्मृतीपात्र सत्यशोधक प्रभावती भालचंद्र बावस्कर यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू – भगिनींना सन्मानपत्र, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व पुरस्कारार्थी बंधू – भगिनींचे अभिनंदन व कौतुक केले. संस्थेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली तसेच फुले – शाहू – आंबेडकरांचा विचार हाच आमचा आधार, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी जळगांव जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, पत्रकारिता, वृक्षमित्र अशा विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे ५० शिक्षक बंधू – भगिनींना तात्यासाहेब जोतिराव फुले – गुणवंत समता शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगावचे पी.डी.पाटील यांना सन्मानपत्र, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.तात्यासाहेबांचा स्मृतीदिन हा खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून मला तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले – गुणवंत समता शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे मी करत असलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची पावती आहे. पुरस्काराने बळ व ऊर्जा मिळते. मी ही ऊर्जा घेऊन सातत्याने शैक्षणिक, सामाजिक कार्य करेल व तात्यासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया सोनवणे, रणजीत सोनवणे, मनोज नन्नवरे, हेमंत लोहार यांनी तर आभार प्रा.मनीषा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष, संपूर्ण विश्वस्त मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.


