



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.18फेब्रुवारी):- जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. घोटाळ्यातील मुख्य तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 90 लाख रुपयांच्या वसुलीचे आदेश, औरंगाबाद विभागाच्या कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळा गेल्या पाच वर्षांपासून गाजत आहे. तर गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना परळी पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. सुनील गीते वय 58, उल्हास भारती वय 64, त्र्यंबक नागरगोजे वय 64 अशी अटक करण्यात आलेल्या, निवृत्त कृषी पर्यवेक्षकांची नावे आहेत. जलयुक्त शिवारातील घोटाळ्यासंदर्भात 2017 मध्ये परळी पोलीस ठाण्यामध्ये 2 कोटी 41 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यात कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी आणि कंत्राटदार यांचा समावेश होता..
दरम्यान या बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांकडून, 90 लाख रुपये वसूल करण्याचे आदेश, औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. या जलयुक्त शिवारातील घोटाळ्यासंदर्भात आत्तापर्यंत, परळीतील अनेक अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई झालेली आहे. काँग्रेसचे वसंत मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती, त्यानंतर मागच्या अनेक दिवसापासून याची चौकशी सुरू आहे. या कामांमध्ये 90 लाख रुपयांच्या वसूल पात्र असलेल्या संस्थांना नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील एकूण 62 कंत्राटदार संस्था आणि अधिकारी कर्मचार्यांकडून या रकमेची वसुली केली जाणार आहे. तर या कारवाईने घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.


