




🔹एकेकाळी पोस्टमनला ग्रामीण भागात देवदूत समजले जात होते
✒️भास्कर फरकडे(तालुका प्रतिनिधी,चामोर्शी)
चामोर्शी(दि.4फेब्रुवारी):-आजच्या संगणक युगात खाकी गणवेशासह सायकलवर येणारा, दारावर टिकटिक करत पोस्टमन शब्द उच्चारणारा व्यक्तीची हाक आता दुर्मिळ झाल्याचे दिसून येत आहे. बदलत्या काळानुसार पोस्टमनची प्रतीक्षा करण्याची वेळ संपत चालली आहे. दारावर वाजणारी टिकटिक किंवा पोस्टमन ‘ हा शब्द कानी पडणे दुर्मिळ होत चालले आहे. पूर्वी पोस्टमनची हाक ऐकू आल्यावर लहान मोठे धावत यायचे.
पोस्टमनचा आदर होत असे. पत्र हाती पडताच घरातील मंडळी आनंदित व्हायची. परंतु आता मोबाइल, व्हिडीओ कॉलिंग, फेसबुक, व्हॉटसअॅवप, ई मेल आदी साधनांतून तत्काळ वार्तालाप होत आहे. त्यावेळी पोस्टमनच्या हातात एखादा टेलिग्राम दिसला की मनात भीतीचे वादळ निर्माण व्हायचे. ज्या घरी पोस्टमन पत्र घेऊन जायचा तेथे शेजारी जमा व्हायचे. पत्रामध्ये आनंद असो की, दुःखाचा समाचार असो, सर्व शेजारधर्म पाळत होते. एकेकाळी पोस्टमनला ग्रामीण भागात देवदूत समजले जात होते. अशिक्षित लोकांना पत्र वाचून दाखवणे, मनीऑर्डरचे पैसे बरोबर पोहोचवणे हे पोस्टमनचे काम होते. पण आता मनीऑर्डर जवळपास बंद झाल्यातच जमा आहेत.




