




🔹शेत शिवारात मोटर केबल चोरट्यांचा हैदोस ; शेतकरी हवालदिल
🔸मोर्शी तालुक्यात ग्रामीण भागामध्ये धाडसी चोऱ्यांचे प्रमाण वाढले
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.4फेब्रुवारी):-तालुका पुन्हा एकदा चोरांच्या हैदोसामुळे प्रकाश झोतात आला आहे. डोंगर यावली, सालबर्डी, पाळा येथे गुरुवारी एकाच रात्री रात्री ९ दुकाने फोडून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच मोर्शीचे ठाणेदार मोहंदूळे व त्यांच्यासह पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन तपास करीत आहे.या धाडसी चोरीमध्ये लाखो रुपयांचा माल व रोख रक्कम लंपास झाला असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यापासून मोर्शी तालुक्यात घरफोड्या, चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ग्रामीण भागातील ही संख्या अधिक आहे. घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्या मोठ्या प्रमानात सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
चोरट्यांनी ग्रामीण भागामध्ये एकाच रात्री ९ दुकानांचे शटर तोडून, कुलूप फोडून या चोरट्यांनी धाडसी चोरी करून लाखोंचा माल घेऊन पोबारा केला आहे. चोरांनी दुकानातील सामान आणि रोकड लंपास करून दुकाने साफ केली आहेत. या घटनेमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच मोर्शी तालुक्यातील डोंगरयावली, घोडदेव, सालबर्डी, दापोरी, पाळा, हिवरखेड यासह संपूर्ण तालुक्यामध्ये शेत शिवारातील मोटर पंपाचे केबल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असून या शेत शिवारातून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून हजारो रुपयांचा तांबा केबल, मोटर, शेतातील किमती साहित्य अज्ञात चोरटे चोरून नेत असल्याने शेतकरी वर्ग सुद्धा हवालदिल झालेला आहे. शेतातील संत्र्याची झाडे व इतरही पिकांच्या ओलितासाठी केबलसह मोटारी बसविण्यात आल्या आहे. केबल व मोटरमध्ये तांबा असल्याने या तांबाताराची विक्री करून चोरटे लाखो रुपयांची माया जमवित आहे.
आर्थिक अडचणीमुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी सीसीटीव्ही कॅमेरा व इतर सुरक्षात्मक यंत्रणा ठेवू शकत नाहीत. अनेकांची दुकाने घरे ही पक्की नसतात. त्याचा गैरफायदा चोरट्यांकडून घेतला जात आहे. दुकानाचे शटर, कुलूप, घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटे दुकानात, घरात प्रवेश करून ऐवज लंपास करत असल्याचे प्रकार मोर्शी तालुक्यात वाढलेले आहेत.
डोंगर यावली येथील ५ दुकाने, पाळा येथील ३ दुकाने, सालबर्डी येथील १ दुकान अशी एकूण ९ दुकाने चोरटयांनी एकाच रात्री फोडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे यामुळे पोलीस यंत्रणेला एक प्रकारे आवाहन देण्याचे काम चोरटयांनी केले आहे. यांमध्ये लाखोचा ऐवज लांबविण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये पोलीसांनी सतर्कता न बाळगल्याने चोरट्यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून पोलिसांना हिसका दाखवत नऊ दुकाने फोडल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शेतकरी तूर्तास हतबल झालेला दिसून येत आहे, आधीच अवकाळी पाऊस गारपीटीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त असून त्यात अशा चोऱ्यांमुळे या भागातील शेतकरी वर्ग आस्मानी व सुलतानी संकटामुळे चिंतातूर झाले आहेत. ग्रामीण भागात दुकाने फोडणारी, घरफोड्या करणारी, मोटर पंप केबल चोरणारी टोळी धुमाकूळ घालून चोऱ्या करत आहे. त्यामुळे या धाडसी चोऱ्यांची दखल घेऊन प्रशासन पोलीस यंत्रना अशा टोळ्यांचा पर्दाफाश करून पोलिस चोरट्यांचा सुगावा लावून त्यांचा बंदोबस्त करणार का याकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मोर्शी तालुक्यात ग्रामीण भागात होत असलेल्या धाडसी चोऱ्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शेतातील इलेक्ट्रिक साहित्य, मोटर, केबल चोरणारी अज्ञात टोळी सक्रिय झाली असून या अज्ञात चोरट्यांचा सुगावा मोर्शी पोलिसांनी लावावा. शहाराप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा गस्त सुरू करावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केली आहे.




