



✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी,बीड जिल्हा)मो:-8000942185
परळी वै(दि.24डिसेंबर):- तालुक्यातील हंगामी वसतिगृहाचा बोगस कारभार चालवणाऱ्या यंत्रणेची चौकशी करुन शासकीय निधी लाटण्यासाठी कागदावरच हंगामी वसतीगृह सुरु असल्याचे भासवणाऱ्या मुख्याध्यापकासह संबंधितास पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ दोषी अधिकाऱ्यांना नियमानुसार सेवाकार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी परळी वै. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी द्वारे करण्यात आली आहे.परळी वै. पंचायत समिती येथील गटशिक्षण अधिकारी यांना देण्यात आलेल्या तक्रारी मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सर्व परिचीत ऊसतोड कामगारांच्या बीड जिल्ह्यातींल ऊसतोड कामगार मागील महिण्यात परिसरातील, राज्यातील व परराज्यातील विविध कारखान्यास ऊसतोडणी करण्याकरिता स्थलांतरीत झालेले आहेत. या ऊसतोडणी कामगारांच्या पाल्यांकरिता शासनाच्यावतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतीगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड यांच्या आदेशान्वये सर्वेक्षण करण्यात आले. त्याअनुषंगाने ऊसतोड कामगाराच्या पाल्यांसाठीचे हंगामी वसतीगृह सुरु करण्याबाबत गटशिक्षण कार्यालयाने आदेशीत केलेले आहे. संभाव्य पटसंख्येआधारे गटशिक्षण कार्यालयाकडून पाहणी करण्यात येऊन अभ्यागतांकडुन प्राप्त पाहणी अहवालानुसार ऊसतोड कामगारांच्या मुलां-मुलीकरिता हंगामी वसतीगृहातील लाभार्थींच्या पटसंख्येस मंजुरी देण्यात आलेली आहे. गटशिक्षण कार्यालयाकडून मंजुर पटसंख्येआधारे ऊसतोड कामगारांच्या मुलां-मुलींकरीताचे हंगामी वसतीगृह सुरु असलेल्या गटशिक्षण अधिकारी कार्यालयाच्या यादीनुसार सामाजिक कार्य म्हणुन आम्ही यादीत नमुद असलेल्या जि.प. शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार व ठरवुन दिलेल्या नियमाप्रमाणे कुठेही ऊसतोड कामगारांच्या मुलांमुलींकरिताचे हंगामी वसतीगृह आढळुन आलेले नाही.
बहुतांश ठिकाणी मंजुर यादीनुसार पटसंख्या पुरेशी आढळुन आलेली नाही. शासनाने दिलेले निर्देश व नियमावलीचे पालन कुठेहो होत नसल्याचे समोर आले. बहुतांश शाळेमध्ये हंगामी वसतीगृह सुरु नसुन कोणाच्या तरी घरी थातुरमातुर स्वरुपात भासवले जात असल्याचे निदर्शनास येते. शासनाने दिलेल्या निर्देश, नियमांना फाट्यावर मारत अनेक शिक्षक विद्यार्थ्यांच्या जेवणावेळी वसतीगृह सुरु असल्याचे दाखवण्यात आलेल्या ठिकाणी हजर नसल्याचे समोर आले. बहुतांश वसतीगृहाच्या ठिकाणी जेवणावेळी घेण्यात येणारे हजेरीपट, थंब इम्प्रेशन मशीन नसल्याचे समोर आले. तसेच बहुतांश ठिकाणी कोविड-19 च्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सुचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. अनेक जि.प. शाळेमध्ये शासकीय निधी लाटण्यासाठी हंगामी वसतीगृह सुरु असलेले कागदावरच चालत असल्याचे आढळले. यावरुन ऊसतोड कामगारांच्या मुलां-मुलींकरिता शासनामार्फत जि.प. कडून सर्व शिक्षा अभियांनांतर्गत चालवण्यात येणारे हंगामी वसतीगृह नेमके कोणासाठी ? कशासाठी ? व का ? चालवले जात आहेत ? असा प्रश्न उपस्थित होतो.
तरी याद्वारे आपणास तक्रार सादर करण्यात येते की, शासकीय निधी लाटण्यासाठी हंगामी वसतीगृह सुरु असल्याचे कागदावरच भासवणाऱ्या मुख्याध्यापकांसह हंगामी वसतीगृहाचा बोगस कारभार चालवणाऱ्या यंत्रणेची चौकशी करून संबंधितास पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह यंत्रणेतील दोषी व्यक्ती विरुध्द कायदेशीर कठोर कार्यवाही करुन नियमानुसार सेवाकार्यमुक्त करण्यात यावे व तात्काळ कार्यवाही न झाल्यास सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही तक्रारी द्वारे देण्यात आला आहे. या तक्रारीवर स. का. पाटेकर, प्रसेनजित आचार्य, नवनाथ पौळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


